छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): शेतकरी, कामगार आणि वंचित जनतेच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय बळीराजा संघटन भारतच्या वतीने 20 जुलै 2025 रोजी टोणगाव व भांबर्डा (ता. जि. संभाजीनगर) येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष भेटीचा कार्यक्रम पार पडला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती डक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा झाला.या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या आणि व्यथा प्रत्यक्ष ऐकून घेणे व त्यावर तातडीने उपाययोजना करणे हे होते. पाण्याची टंचाई, वीज पुरवठ्याची अस्थिरता, पीक नुकसान भरपाईचा विलंब, हमीभावाचा अभाव आणि शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष – या सर्व समस्या शेतकऱ्यांनी मांडल्या. संघटनेने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत लवकरात लवकर उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त केला.या कार्यक्रमाला मराठवाडा, विदर्भ, खान्देश, कोकण व पश्चिम महाराष्ट्र या प्रमुख विभागांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दौऱ्यादरम्यान अनेक नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यासोबतच काही नव्या कार्यकर्त्यांनी संघटनेत जाहीर प्रवेश करून संघटनेला अधिक बळकटी दिली आहे.संस्थापक अध्यक्ष निवृत्ती डक पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, “शेतकऱ्यांचा आवाज कुणीही दाबू शकणार नाही. संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.” त्यांनी शेतकऱ्यांना सामाजिक, आर्थिक व शासकीय हक्क मिळवून देण्यासाठी संघटनेने कृतीशील आणि संघर्षशील राहण्याची भूमिका मांडली. या भेटीद्वारे बळीराजा संघटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले की, ती केवळ आंदोलनापुरती मर्यादित नाही, तर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सक्रिय आणि ठोस काम करणारी संघटना आहे.